रत्नागिरीपासून २० किमी अंतरावर दक्षिणेस हरचिरी नावाचे एक गाव आहे. वरच्या हरचिरीतील जुन्या महाकाली मंदिराजवळ असलेला हा महाकाय शीडम वृक्ष अर्थात Tetrameles nudiflora R. Br. (Tetramelaceae). रस्त्याच्या डाव्या बाजूस खाली घळणीवर उभा आहे. वरून जाणाऱ्याच्या नवख्या माणसास ‘नजरबंदी’ करून खाली बोलावून गाठ-भेट केल्याशिवाय जाऊ देत नाही हा. तीनशे-साडे तीनशे वर्षांतील चांगली वाईट वादळे भरून राहिलीत याच्यात.
हरचिरीचे ग्रामस्थ सांगतात की साधारण १५ वर्षांपूर्वीपर्यंत या शीडमावर एक दीड मीटर लांबीची किमान २० ते २५ मधमाशांची पोळी लटकलेली दिसायची. आंबा बागायातींच्या परागीकरणात त्यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता. आता एकही नाही. त्याच कारण आम्ही ना-लायक. आंब्यांवर ८ काय आणि १० काय, किटकनाशकांच्या फवारण्या केल्याशिवाय आमचं भागत नाही. शेजारच्या बागेत १० झाल्या तर मी १२ करणार आणि पुन्हा शेखी मिरवणार. काही ठिकाणी १५ पर्यंत जातात हे आणि वर आणखी कौतुकाने सांगतात चार लोकांत. म्हणजे आंब्यांना अंघोळच घालतात थोडक्यात. तर अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत शीडमावर आज एकही मधमाशी दिसत नाही.
महाकाली मंदिराचा परिसर आहे आणि ‘देवपाण’ वगैरे असल्याने कदाचित हा शीडम राहिला असावा. कारण देवळाच्या या वरच्या परिसरात केवळ हा एकाच वृक्ष शिल्लक आहे, बाकी सगळ चकाचक साफ. मला मात्र त्याचीही भविष्यात शाश्वती वाटत नाही. कारण वेळ पडल्यास देवाचाच कौल घेऊन देवराईत झाड तोडायची परमिशन मागणारे आम्ही ‘देवाचे लाडके’ आणि तो ती देणारा, हे ही ‘नसे थोडके’.
- मिलिंद पाटील